कठोर निकषांमुळे लाभार्थी संख्येत मोठी घट; ९० लाख ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर डिसेंबरमध्ये निधी जमा होण्याची शक्यता.
नमो योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येबद्दल आणि आठवा हप्ता जमा होण्याच्या तारखेबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे की, सरकारने लागू केलेल्या कठोर निकषांमुळे या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सातत्याने घटत आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता जवळपास ९६ लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र, निकष कठोर झाल्यानंतर २१ व्या हप्त्यात ही संख्या घटून ९२ ते ९३ लाखांवर आली. आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता केवळ ९० लाख ४१ हजार २४१ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
लाभार्थी वगळण्यामागील मुख्य कारणे
योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकरी वगळले जाण्यामागे सरकारने लागू केलेले नवीन आणि कठोर नियम आहेत. अनेक अपात्र लाभार्थी योजनेतून बाहेर काढले जात आहेत. वगळलेल्यांमध्ये प्रामुख्याने २८ हजार मृत लाभार्थी आणि सुमारे ३५ हजार दुहेरी लाभार्थी (जे एकाच वेळी दोन ठिकाणी लाभ घेत होते) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, सरकारने कुटुंबातील रेशन कार्डावर आधारित फक्त एकाच व्यक्तीला लाभ देण्याचा नियम केला आहे. यामुळे नवरा-बायको दोघांच्या नावाने लाभ मिळणाऱ्या कुटुंबांना फटका बसला असून, त्यापैकी एका व्यक्तीला योजनेतून वगळण्यात आले आहे.
















